लोणावळा – आठवड्याभरापूर्वी हजेरी लावलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरी नंतर मान्सून पावसाने बुधवारी मावळात सर्वदूर दमदार हजेरी लावल्याने मावळातील बळीराजासह सर्व स्तरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून धुळवाफेवरील भातपेरणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. पवन मावळातील शेतक-यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजानुसार पावसापूर्वी पवना नदीच्या पाण्यावर १५ दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या भातरोपांची उत्तम वाढ झाली असून, ती हिरवीगार भातरोपे शेतात वा-यावर डोमाने डोलत आहे.
मागील दोन आठवड्यापासून मावळातील शेतकरी शेतीची नांगरणी, भातखाचर व वावरातील मोठी ढेकळे बारिक करणे (लोडणी), कुळपणी, रोपांची वाढ उत्तम व्हावी याकरीता राना वनातील पालापाचोळा गोळा करून त्यात शेणखत एकत्र करून भात रोपवाटीकेची भाजणी करणे, अशाप्रकारच्या विविध शेतीच्या मशागतीची कामांमध्ये शेतकरी व्यस्त होते. तत्पूर्वी गतवर्षीच्या पूरात भातखाचरांचे फुटलेले आणि वाहून गेलेल्या बांधाची दुरूस्ती व बांधणीलाहि करत होते. मावळामधील पवनमावळ परिसरातील शेतक-यांनी मान्सूपूर्व पावसापूर्वी पवनानदी व बोरवेलच्या पाण्यावर १५ दिवसांपूर्वीच भातपेरणी केलेल्या भातरोपांची उत्तम वाढ झाली असून, ती हिरवीगार भातरोपे वा-यावर डोमाने डोलत आहे. वाढ झालेल्या भातरोपांची येत्या १० ते १५ दिवसांत लागवड सुरु होईल. बुधवारी पहाटे पासून मान्सूनने मावळात सर्वदूर दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. मान्सूनच्या पावसाने मावळातील धबधबे ओसंडून वाहू लागले असून, काही भातखाचरे पाण्याने भरली आहे तर कोरडे झालेले ओढे-नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत.
यावर्षी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सूनच्या प्रतिक्षेतील शेतकरी भात पेरणीच्या लगबगीला लागला होता. मावळात आंबेमोहर, साळ, दोडकी, कोळम, इंद्रायणी या पारंपारिक भातबियाणांसह कोकणी, पार्वती, फुलेसमृध्दी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी व तृप्ती या संकरित विकसित भातबियाणांच्या वाणालाही मावळात उत्तम प्रतिसाद आहे. मावळातील पश्चिम खो-यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने याठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोळम आणि इंद्रायणी भातांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.