लोणावळा : निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून संपूर्ण देशभरात एकूण 7 टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी संपन्न होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी संपन्न होणार आहे. या संपूर्ण निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी केली जाणार असून देशात कोणतं सरकार येणार हे तेंव्हाच जाहीर होईल.
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात लोकसभेच्या 543 जागांसाठी या निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुका अनुक्रमे 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे व 1 जून या दिवशी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण 48 जागांसाठी पहिल्या 5 टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. यात 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघ, 26 एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघ, 7 मे च्या तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघ, 13 मे च्या चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघ आणि 20 मे च्या पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघाचा समावेश असणार आहे.
पुणे जिल्ह्यात समाविष्ट असणाऱ्या बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल असणार असून येथे तिसऱ्या टप्प्यात अर्थात 7 मे रोजी निवडणूक संपन्न होणार आहे. तर पुणे, मावळ आणि शिरूर या तीन मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल असणार असून येथे चौथ्या टप्प्यात अर्थात 13 मे रोजी मतदान घेतले जाणार आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
◾पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ